सातरीच्या ट्रॅक्टर रेती तस्करांचा वर्धा नदीपात्रात धुमाकूळ
धुळीचा शेतपिकांवर परिणाम
राजुरा : येथील मुख्यालयापासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या सातरी गावातील ४ ते ५ रेती तस्करांनी वर्धा नदीत धुडगूस घातला असून दररोज ४० ते ५० ब्रास रेतीची चोरटी वाहतूक करण्यात येत आहे. रेती तस्करांचा गोरखधंदा रात्रीच्या अंधारात सुरू आहे. पांदण रस्त्यांनी ट्रॅक्टरची ये-जा सुरू असल्याने धूळ शेतपिकांवर पडत आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीचा संताप पहायला मिळत आहे.
सध्या महसूल नाले रेतीविना कोरडे पडले आहे. त्यामुळे सातरीच्या रेती तस्करांनी वर्धा नदीत धुडगूस घातला आहे.आज घडीला गावातील ४ ते ५ ट्रॅक्टर मालक रेती तस्करांकडून उपसा सुरू आहे. यासाठी पात्रात मोठमोठे खड्डे खोदण्यात येत आहे. रेतीच्या चोरट्या वाहतुकीकरिता तस्करांनी रस्ता तयार केला आहे. रेती तस्करीचा गोरखधंदा रात्रीच्या अंधारात सुरू आहे. दररोज ५० ब्रासच्या आसपास रेतीची उचल करण्यात येत असल्याची माहिती आहे. सातरी ते वर्धा नदी या दोन किमी अंतरावरच्या पांदण रस्त्यांनी ट्रॅक्टरची नियमित ये जा सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष पहायला मिळत आहे. वाहतुकीमुळे रस्त्यावरची धूळ शेतपिकांवर पडत असल्याने त्याचा विपरित परिणाम पिकांवर होत असल्याची ओरड सुरू आहे. पिकासोबतच पांदण रस्त्याची पुरती वाट लागल्याने शेतकऱ्यांना ये जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महसूल विभागाने या रेती तस्करांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.