रोजगार निर्मितीकरीता लोहखनिज आधारीत उद्योगांसाठी स्वतंत्र एमआयडीसीची निर्मिती करा – आ. किशोर जोरगेवार
अधिवेशनात मागणी, मतदार संघातील विविध महत्वांच्या प्रश्नांकडे वेधले सभागृहाचे लक्ष
सुरजागड येथे ६३ टक्याच्यावर आयरन यील्ड असलेले देशातील उत्तम दर्जाचे लोहखनिज मिळाले आहे. याचा योग्य उपयोग करत रोजगार निर्मिती करिता लोहखनिजावर आधारीत उद्योगांसाठी चंद्रपूरात स्वतंत्र एमआयडीसी निर्माण करण्याची मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी कायदा सुव्यवस्थेसह मतदार संघातील अनेक महत्वाच्या विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे.
मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील अनेक ज्वलंत प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. दरम्यान काल मंगळवारी बोलताना त्यांनी अनेक महत्वाचे विषय सभागृहात मांडलेत. चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. त्यामुळे नवे उद्योग जिल्हात येण्यासाठी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था उत्तम असली पाहिजे. दारुबंदी उठल्या नंतर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. यात कोळसा चोरी, ड्रग्स, अवैध दारु, ऑनलाईन जुगार यासारखे अवैध धंदे फोफावले आहे. त्यामुळे यावर अंकुश लावण्यासाठी जिल्ह्यात अतिरिक्त पोलिस कर्मचारी आणि अधिका-र्यांची नेमणुक करण्यात यावी, जिर्ण झालेली चंद्रपूर सिटी पोलिस ठाणे आणि घुग्घुस पोलिस ठाण्यासाठी सोयी सुविधा युक्त नवी इमारत बांधण्यात यावी, अतिरिक्त वाहणे उपलब्ध करुन देण्यात यावी, रामनगर पोलिस ठाण्याची हद्द मोठी आहे.
त्यामुळे सदर पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या शास्त्रीनगर पोलिस चौकीचे रुपांत्तर पोलिस ठाण्यात करण्यात यावे. अशी मागणी त्यांनी गृह विभागाला यावेळी केली आहे. तर दारु बंदी उठल्या नंतर अनेक नविन दारु दुकाने, बिअर बार सुरु झाले. येथे नियमांना डावलुन सुरु असलेल्या अवैध दारुविक्रीमुळे अनेक जीवघेणे गुन्हे घडले आहे. त्यामुळे नियम डावलून येथे अवैधरित्या सुरु असलेल्या दारु विक्रीवर अंकुश लावण्यात यावे अशी मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
चंद्रपूर हे वाढत शहर आहे. चंद्रपूर येथे लगतच्या राज्यातुनही नागरिक वास्तव्यास येथे आहे. त्यामुळे येथील उर्जेची गरज भागविण्यासाठी भूमिगत विद्युत वाहिनी टाकत राष्ट्रवादी नगर येथे सबस्टेशन सुरु करण्यात यावे, सिएसटीपीएस मधुन निघणा-र्या राखीमुळे शेतपीकांवर धुर जमा होत असुन शेतीचे मोठे नुकसान होत आहे. येथील नाला पुर्ण पणे राखीने भरला आहे. मात्र प्रशासन नाला खोलीकरण करण्याऐवजी गवत कापण्यासाठी सात काटी रुपये खर्च करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत सदर नाल्याच्या खोलीकरणासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा.
चंद्रपूर हे औद्योगिक शहर आहे. येथे ५० हजारहुन अधिक अस्थायी कामगार आहे. असे असतांना दुर्दैवाने येथे पूर्ण वेळ कामगार आयुक्त नाही. सिएसटीपीएस येथे १०३ सुरक्षा रक्षकांना कामावरुन कमी केले आहे. त्यांचे प्रकरणही कामगार आयुक्तांकडे सुरु आहे. असे कामगारांचे अनेक प्रश्न येथे आहे. त्यामुळे कामगारांना न्याय देण्यासाठी येथे नवीन कामगार आयुक्त कार्यालय निर्माण करुन पुर्ण वेळ कामगार आयुक्तांची नियुक्ती करण्यात यावी, चंद्रपूर येथे इरई धरणा व्यतिरिक्त दुसरे कोणतेही पाण्याचे स्त्रोत नाही. या ठिकाणी पाऊस पडला नाही. तर हे घरण भरल्या जात नाही. त्यामुळे धानोरा बॅरेजची मोठी आवश्यकता आहे. हि बाब लक्षात घेत धानोरा बॅरेजचा डिपीआर मंजुर करण्यात यावा अशी मागणी यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली आहे.