दिवाळीची जाहीरात मिळेल…?

0
624

दिवाळीची जाहीरात मिळेल…?

 


पत्रकारांच्या आयुष्यातील वाटा नेहमीच खडतर असतात नव्हे खडतर वाटेने प्रवास केल्याशिवाय पत्रकारिता समजत नाही. आभासी जगात जगणाऱ्या लोकांना हे शेवटपर्यंत कळत नसतं. दररोज लोकांसाठी बातमीच्या माध्यमातून भांडणारा पत्रकार सध्या दिवाळीच्या जाहीरातीचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी कसरत करीत असुन तो हक्काच्या लोकांकडे “दिवाळीची जाहीरात मिळेल ?” अशी विचारणा करतांना दिसतोय. गणेश उत्सव संपला कि सर्व वर्तमानपत्राचे व्यवस्थापन दिवाळी जाहीरात विषयावर कामाला लागते तर मोठ मोठ्या वर्तमानपत्रील मँनेजमेंट बैठका घेवून स्थानिक वार्ताहर, पत्रकार यांना टार्गेट देवून कामाला लावतात, जाहिराती मिळवण्यासाठी वाट्टेल ते करा पण जाहिराती मिळवा अशी तंबी देत असतात.

जाहिराती मागायच्या कुणाला तर जाहिराती देवू शकणारे, व्यापारी, पुढारी, उद्योजक, संस्था, शासकीय कार्यालये यांचेकडे जाहिरातीची मागणी सुरू होते तसेच वर्षभर ज्यांना वर्तमानपत्रातुन ठळक प्रसिद्धी दिली अशा लोकांना जाहिरात मागीतली जाते. अनेक लोक जाहीराती देतात मात्र काही दिवाळीला जाहीरात मागायला गेले कि,

1) आपला दोन नंबरचा धंदा नाही, कुठुन देवू जाहीरात

2) तुम्हाला दिली कि सर्वांना द्यावी लागेल.

3) आपल्याला जाहिरातीची आवश्यकता नाही.

4) किती लोकांना जाहीरात देवू सर्वांना द्यायला मी का राजा हरिश्चंद्र आहे का ?

5) आम्हाला देता येत नाही अशा विविध प्रश्नांची सरबत्ती करुन जाहीरात मागायला आलेल्या पत्रकाराला परत पाठवले जाते.

जाहिरात देणे हा देणा-याचा अधिकार आहे. मात्र आपण आपल्या कुवतीनुसार सर्वाना नाही मात्र जे नेहमीच आपल्याला प्रसिद्धी देतात अशांना आपण जाहिरात देवून मदत करु शकता. शेवटी चौथ्या आधार स्तंभाला बळकट करण्याची जबाबदारी आपली आहे हे कुणीही विसरता कामा नये. जाहिरात मागायला आलेला पत्रकार हा आपला मित्र असतो तो वर्षभर आपल्याला मदत करीत असतो. त्यामुळे तो जाहिरात मागतांना शत्रू वाटु नये याची जानिव ठेवायला विसरतात काही लोक… तर स्पष्टपणे नाही न म्हणता काँल घ्यायला टाळाटाळ करतात देण्याची कुवत असुनही देत नाही.

लक्षात असु द्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हळुहळु “प्रायव्हेट लिमिटेड” होत असून तो कुणाचाही तर “बांधिल” झालेला पहायला मिळत आहे. ज्यावेळी आपल्या मनाविरुद्ध बातम्या बघतो त्यावेळी आपण दोन चार शिव्या हासडतो मात्र हे का घडत आहे याचा विचार करीत नाही. पत्रकार आणि पत्रकारितेत काही पोटभरु, दलाल घुसलेले आहेत ते कुठेही कधीही वाकतात अनैतिक काम करणाऱ्यांना मदत करीत असतात, ते म्हणजे सर्व पत्रकार नव्हेत. अनेक हाडांच्या पत्रकारांनी हे क्षेत्र केवळ टार्गेट मुळे सोडलेले आहे. जाहिरातीच्या नावाखाली कधीही स्वाभिमान गहाण ठेवू न शकणारे पत्रकार टार्गेट पुर्ण करु शकत नाही. लोक चौथ्या आधारस्तंभाच्या या कठीण वाटचालीत सोबत राहिले नाही तर भविष्यात मिडिया हा हस्तक बनून काम करु लागेल. त्यावेळी वेळ गेलेली असेल. आज लोकांना जो न्याय मिळतो त्यामध्ये चौथ्या आधारस्तंभाचा मोठा वाटा आहे. शासकीय कार्यालयात वर्षानुवर्षे न्यायासाठी, कामासाठी चकरा मारणा-या लोकांच्या अन्यायाला शेवटी पत्रकार वाचा फोडतात तेंव्हाच त्या धुळखात पडलेल्या फायली उघडल्या जातात, अनेकांना न भूतो अशी मदत होते. त्यात पीडित, शोषित, रुग्ण, विद्यार्थी, शिक्षक, डॉकटर, वकील यांचाही समावेश असतो. शहरातील रस्त्यावर केलेले खोदकाम, पडलेला कचरा, बंद पथदिवे, अपघात, सामाजिक क्षेत्रातील घटनांना प्रसिद्धी देणे टाळून राजकारणी किंवा इतर पैशावाल्यांच्या आरत्या ओवाळणी सुरू केल्यास कुणाचेही टार्गेट कमी होणार नाही. मात्र जबाबदारीचे भान ठेवून वागणा-या पत्रकारांना दिवाळीची जाहिरात मागायला आल्यावर झिडकारू नका, शक्य तेवढी मदत करा, खरोखरच कुवत नसेल तर नाही म्हणा पण डावलु नका.

नाहीतर कॉर्पोरेट मीडिया प्रमाणे आमच्या सारख्या दैनिकांना देखील, कोण किती सुडौल, अमुक तमुक ने सोशल मीडियाचा वाढवला पारा, हिचा बोल्डनेस पाहून तुम्ही थक्क व्हाल, किंवा मग मूळ प्रश्न सोडून द्वेष पसरवणाऱ्या, धार्मिक तेढ वाढवणाऱ्या बातम्या देणे भाग पडू शकते.

पत्रकारांची दिवाळी गोड करण्यासाठी एक जाहिरात द्या. करोडो रुपयांचे मालक असलेल्या मात्र नेहमीच गरीब असल्याचा आव आणणा-या करबुडव्या, सामाजिक बांधिलकी न जपणा-यांना दिवाळीच्या अँडवान्स शुभेच्छा…!!!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here