जनता महाविद्यालय द्वारा रासेयो स्थापना दिनानिमित्त ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ उपक्रम।
(प्रा.महेन्द्र बेताल बल्लारपूर प्रतिनिधी)
चांदा शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित जनता महाविद्यालय, चंद्रपूर च्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग च्या वतीने दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन निमित्ताने संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ अशोकभाऊ जीवतोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम सुभाष यांचे मार्गदर्शनात ग्राम पडोली येथे “माझे कुटुंब माझी जबाबदारी” हा उपक्रम राबविण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मिलिंद जांभुळकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन करताना सुरुवातीला विद्यार्थ्यांबरोबर ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधला. जिल्हा परिषद तसेच ग्राम पंचायत मधून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही पत्रके गोळा केली. सदर माहिती पत्रके घरोघरी वाटप करण्यास स्वयंसेवक यांना सांगितले. प्रत्येकांनी आपली काळजी घेतल्यास जागतिक महामारी कोरोना ह्यास आपण पळवून लावू शकतो. हे रासेयो स्वयंसेवक यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितले. यामुळे केवळ स्वतःचीच सुरक्षा होते असे नव्हे तर शासनाला देखील मदत होते.
घराबाहेर पडतांना मास्क वापरलाच पाहिजे. काही शारीरिक अंतर ठेवून व्यवहार करा.वारंवार हनुवटीकडे मास्क ओढू नका,अन्यथा कोरोना संक्रमणास बळी पडावे लागेल. कार्यालयात किंवा कुठे कामावर जाताना पूर्वीप्रमाणे एकत्रित जेवण करू नका. नातेवाईकांना बोलवू नका, तुम्ही सुध्दा त्यांच्या घरी जाणे टाळा. खूपच आवश्यकता असेल तरच जा. कोरोनाग्रस्त लोकांपासून दूर रहा पण मनाने जवळ रहा. बेजबाबदारपणा टाळा. हात मिळविणे किंवा आलिंगन देणे टाळा. छोट्या मुलांचे पापा घेणे बंद करा. शक्यतो बाहेरचे खाणे टाळा.अशा विविध प्रकारच्या सूचना स्वयंसेवक यांनी सांगितल्या. माहिती पत्रक संपूर्ण वाचन करा, त्यावर मनन करून अंमलबजावणी करा. पत्रके फाडु नका, फेकून देऊन केरकचरा करू नका, उलट स्वतःच्या वाचनानंतर इतरांना ते देऊन सामाजिक उत्तरदायित्व पत्करा. लोकांनी देखील हा चांगला उपक्रम असल्याचे बोलले. अशा प्रकारे रासेयो स्थापना दिन साजरा करण्यात आला. उपक्रम यशस्वी होण्यासाठी विशाल कांबळे, अंकित बैरागी, समीर विरुटकर इ. स्वयंसेवक यांनी सहकार्य केले.