पूरग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करा- आ. विजय वडेट्टीवार
राजुरा, गोंडपिपरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी
चंद्रपूर, 22 जुलै – गेल्या पंधरवड्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अतिवृष्टी व नदीना आलेला महापूर यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली येऊन यात शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. देशाच्या अन्नदात्यावर कोसळलेले हे संकट दूर करण्यासाठी काँग्रेस पक्ष यथा शक्ती मदत करीत असून शासनाने पूरग्रस्त भागाचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री ,काँग्रेस नेते आ.विजय वडेट्टीवार यांनी केली.ते राजुरा व गोंडपिपरी तालुक्यांतील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असता बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने राजुरा विधानसभा क्षेत्र आमदार सुभाष धोटे, चंद्रपूर ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे महिला, ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, माजी प. स. सभापती कुंदाताई जेणेकर, गोंडपिपरी तालुका अध्यक्ष तुकाराम झाडे कार्याध्यक्ष निलेश संगमवार, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष रेखा रामटेके, माजी कृउबा उपसभापती, अशोक रेचनकर, देविदास सातपुते, तूकेश वानोडे, सुरेश श्रीवास्कर, महेंद्र कुंनघाडकर तथा प्रशासकीय अधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले की, संपूर्ण राज्यातच अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली या आसमानी संकटामुळे नद्या नाल्यांना पूर आला व शेतकऱ्यांची उभे पिके उध्वस्त झाली. अशा विदारक परिस्थितीत काँग्रेस पक्षाचे वतीने संपूर्ण पूरग्रस्त भागात पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व न्याय मिळवून देण्यासाठी पूरग्रस्त भागांची पाहणी सुरू असून याचा अहवाल लवकरच विधानसभेत मांडून तात्काळ आर्थिक मदत मंजूर करणे हेतू यशस्वी प्रयत्न चालू केला जात आहे असेही ते म्हणाले.
तर राजुरा विधानसभा क्षेत्रात आमदार सुभाष धोटे यांनी क्षेत्रातील जनतेला व नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देत एक कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून काँग्रेस पक्ष आपल्या संपूर्ण पाठीशी ताकदीने उभा असल्याची ग्वाही याप्रसंगी दिली. यावेळी उपस्थित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना राजुरा मतदार संघात झालेल्या धानोरा, चिंचोली, कविटपेठ, सिंधी, तोहगाव, विरूर स्टेशन या पूरग्रस्त व नुकसानग्रस्त भागाचे योग्य पंचनामे करून नागरिकांना मदत करावी अशी सूचना करण्यात आल्या. तसेच पूर परिस्थिती नंतर ग्राम खेड्यांमध्ये येणाऱ्या रोगराई व संसर्गजन्य रोगांपासून नागरिकांचा बचाव करणे हेतू प्रशासनाने पूर्व नियोजन करावे. अशाही सूचना देण्यात आल्या. यावेळी राजुरा व गोंडपिपरी तालुक्यातील बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते व जनसामान्य नागरिक उपस्थित होते.