बॅक वॉटरमुळे वर्धा नदीला पुन्हा पूर – कोलगावला पुराचा वेढा
राजुरा – चंद्रपूर राज्यमार्ग बंद
राजुरा/प्रतीनिधी पूर ओसरल्यानंतर तिसऱ्याच दिवशी धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने आणि वर्धा व अन्य जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वर्धा नदीला पुन्हा पूर आला आहे. आज दिनांक 19 जुलैला दुपारी 12 वाजता राजुरा – बल्लारपूर मार्गावरील वर्धा नदीवरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली. सायंकाळी सात वाजता राजुरा – सास्ती रस्त्यावर दीड फूट पाणी आले असले तरी सध्या हा रस्ता सुरु आहे. रात्री आठ वाजेपर्यंत हा रस्ता बंद होईल, असा कयास आहे. आज सकाळीच कोलगाव या गावाला पुराने वेढल्याने त्याचा राजुरा मुख्यालयाशी संपर्क तुटला.
दरम्यान या बॅक वॉटर मुळे नदी व नाले असलेल्या शेती क्षेत्रात पुन्हा पाणी आले आहे. यामुळे पूर उतरल्यानंतर आता शेतीचे पुढील नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा जबर हादरा बसला आहे. प्रशासन सर्व गावातील नुकसानीचा आढावा घेत आहे.