घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली जाळला जातो कचरा

0
388

घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली जाळला जातो कचरा

 

कोरपना/प्रतिनिधी : गडचांदूर नगरपरिषदेच्या वाहनांद्वारे दररोज शहरातील विविध वॉर्डातून ओला व सुका कचरा गोळा करून जवळच्या घोडामगुडा रस्त्यावरील एका ठिकाणी असलेल्या डंपिंग यार्डवर टाकला जात आहे. त्या ठिकाणी कचरा संकलनासाठी कोणतेही डेपो नाही. कचऱ्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होत नाही. केवळ कचरा डंप केला जात आहे. यामुळे कचऱ्यातील प्लास्टिक व इतर वस्तू आजुबाजुच्या शेतात जात असल्याने शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

वास्तविक पाहता यावर प्रक्रिया करण्याची गरज आहे. मात्र कचऱ्याच्या ढिगाऱ्याला जाळले जात आहे. यातील प्लास्टिक व इतर वस्तू जळत असल्यामुळे वायू प्रदुषणात वाढ होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नैसर्गिक पर्यावरणाची हानी होत असून हे प्रकार गेल्या एक दोन वर्षापासून सतत सुरू आहे.

काही दिवसांनी पावसाळा सुरू होणार आहे. मग अशा परिस्थितीत याठिकाणी सैरावैरा पडलेल्या केर कचऱ्यातून दुर्गंधी पसरून नागरिकांना आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकते. नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे, या उद्देशाने शहरातील केरकचरा, टाकाऊ पदार्थ, प्लास्टिक इत्यादींचे व्यवस्थापन करण्यासाठी दरवर्षी लाखोंची निविदा काढून घनकचरा व्यवस्थापनाचे काम दिले जाते.

शासन स्तरावरून यासाठी लाखोंचा निधी पुरविला जातो. मात्र याठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली संबंधित कंत्राटदाराने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू केला असून शासन निधीची व्यवस्थितपणे वाट लावली जात असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.

संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन या कचऱ्याची व्यवस्थितपणे विल्हेवाट लावाली. या कचऱ्यातून कम्पोस्ट खताची निर्मिती करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here