महिला सक्षमीकरणाकरीता पुरुषांच्या मानसिकतेत बदल होणे आवश्यक – प्रा. उज्वला जाणवे
महिलांचे सक्षमीकरण करायचे असेल तर स्त्री पुरुषांच्या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रा. उज्वला जाणवे यांनी केले आहे. शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती आणि आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभाग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरण या विषयावर पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. उज्वला जाणवे होत्या.
त्या पुढे म्हणाल्या महिलांनी स्वतः सक्षम बनून प्रत्येक समस्येचा सामना करावा. महिलांना त्यांचा सन्मान द्यावा. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह म्हणाले महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी महिलांनी संघटित व्हायला पाहिजे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत कार्यक्रमाच्या आयोजीका डॉ. माया मसराम म्हणाल्या महिलांच्या मानसिक व शारीरिक शोषणाला येथील पुरुष प्रधान व्यवस्था जबाबदार आहे. म्हणून त्यात बदल होणे काळाची गरज आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय गोरे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ,हेमचंद दूधगवळी, डॉ. सुनील बीडवाईक, डॉ. राजेश गायधनी, डॉ. सतेंद्र सिंग, प्रा. मंगेश करंबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैभवी लांडे हिने केले तर आभार कु. प्रणाली ताजणे ह्या मुलीने मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम केले. तसेच विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला.