‘नाली सफाई’ बाबत ग्रामपंचायत कविटपेठ ची उदासीन वृत्ती, जनतेच्या आरोग्याशी मांडला खेळ
राजुरा, अमोल राऊत : पंचायत समिती राजुरा अंतर्गत येणारी ग्रामपंचायत कविटपेठ येथील नाल्या कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत. पावसाळा सुरू झाला असल्याने या गलिच्छ नाल्या रोगराईस आमंत्रण ठरत आहेत. मात्र ग्रामपंचायत प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याने स्थानिक जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नालीतील पाणी साचल्याने ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच काही नागरिकांनी संडासचे पाणी नालीला सोडल्याने डास व मच्छरांचे निवासस्थान तयार होत आहे. डबके साचल्याने मच्छरांचा उपद्रव वाढून साथीचे रोग निर्माण होण्यास आमंत्रण ठरणार आहे. घराजवळील नालीतील पाणी वाहते राहावे यासाठी काही नागरिक स्वतः हातात पावडे घेऊन नाली साफ करत आहेत. हि ग्रामपंचायत करिता लाजिरवाणी बाब आहे.
“पावसाळा सुरू होण्यापूर्वी पासून नाली सफाई करण्याची बाब निदर्शनास आणून दिली. मात्र पावसाने हजेरी लावूनसुद्धा नाली सफाई करण्याकडे कानाडोळा केला जात असून अजूनपर्यंत नालीसफाईचा मुहूर्त सरपंच व उपसारपंचांना मिळेनासा झाला आहे. जनतेच्या आरोग्याशी जुगार न मांडता तातडीने नाली सफाई करावी.”
– आनंदराव देठे
सदस्य ग्रामपंचायत कविटपेठ